श्री मोहन गोरे
यांनी स्वतःबद्दल लिहिलेलं
आनंदयात्री हे यातलं
पहिलं पुस्तक आहे.
आत्मचरित्र लिहिण्यामागचा उद्देश असतो तो
आपलं आयुष्य कसं
गेलं हे पडताळून
पाहणं. त्यातून जे बरेवाईट
अनुभव मिळाले ते
लोकांशी वाटून घेणं. मोहन
गोरे यांनीही असेच
वेगवेगळे प्रसंग लहान लहान
प्रकरणांमधून वाचकांपुढे मांडले आहेत.
अत्यंत सोपी साधी
अशी भाषा आणि
प्रत्येक प्रसंगाला खुलवून सांगण्याची
शैली यांच्यामधूनच या
उमद्या व्यक्तिमत्त्वाचीही ओळख होत
जाते.
सधन कुटुंबात जन्माला येऊनही मोहन गोरे यांचं पुढचं आयुष्य मात्र खूपच कष्टात गेलं. एका अनपेक्षित संकटामुळे घरची सांपत्तिक स्थिती पराकोटीची खालावली आणि संपूर्ण गोरे कुटुंबावरच अडचणींचा काळ ओढवला. त्यावेळच्या आठवणी सांगताना लेखनात कडवटपणा आला तर खरं म्हणजे नवल नाही. पण या सगळ्या लेखनामध्ये तक्रारीच्या सूराचा जरासा लवलेशही आढळत नाही. किंबहुना अगदी मनमोकळेपणी ते त्या काळातल्या घटनांबद्दल लिहितात. अंगभूत कुतूहल आणि मुळातली कुशाग्र बुद्धी, हे त्यांचे दोन्ही पैलू सुरुवातीच्या काही प्रकरणांपासूनच जाणवत राहतात. त्या काळात सामाजिक जबाबदारीचं उत्तम भान जपणारी जी अनेक माणसं गोरे यांना भेटली, त्यांनी गोरे यांच्या या बुद्धिमत्तेला, व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात मोलाचा हातभार लावला. त्यांच्याबद्दलही त्यांनी लिहिले आहे. शालेय जीवनापासून सुरू झालेलं हे स्मरणरंजन पुढे त्यांच्या यशस्वी कारकीर्दीचाही आढावा घेतं.
पुस्तक वाचायला घेतानाच जाणवते ती लेखकाची निर्मळ विनोदबुद्धी. हजरजबाबीपणा आणि विसंगती टिपणार्या मिश्किल कोट्या यांच्यामुळे एखाद्या अवघड प्रसंगालाही ते सहजपणे सामोरे जातात. गोरे यांच्या वृत्तीचं वर्णन करायचं तर निराशेला जराही वाव न देता मनाजोगतं घडेपर्यंत चिकाटीने आणि सचोटीने प्रयत्न करत राहणं असं करावं लागेल. या वृत्तीमुळेच आयुष्यात नवनव्या संधी मिळवत, कधी त्या निर्माण करत, तर कधी अडथळ्याचंच संधीमध्ये रूपांतर करत त्यांनी स्वतःची प्रगती साधली. या सगळ्याचं वर्णन आनंदयात्रीमध्ये आलं आहे. एक उदाहरणच द्यायचं तर त्यांनी पहिलीच नोकरी ज्या प्रकारे मिळवली त्या प्रसंगाचं देता येईल. तो सारा प्रसंगच लेखकाचा आयुष्याकडे पाहायचा दृष्टीकोन किती सुदृढ आणि कणखर आहे, हे सांगणारा आहे. तिथून पुढे त्यांनी कायमच आपत्तीचा संधीत आणि संधीचा यशात कायापालट करून दाखवला. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की कठीण काळातून जाणारा एखादा वाचक या पुस्तकाचं बोट धरून नक्कीच सकारात्मक होण्याकडे वाटचाल करू शकेल.
नोकरीच्या आणि नंतर
व्यवसायाच्या काळात गोरेंना भेटलेली
अनेक स्तरांवरची, अनेक
स्वभावांची, देशोदेशीची असंख्य माणसं
हा या पुस्तकाचा
अजून एक विशेष.
तुमच्या आयुष्यात येणार्या, आणि
विशेषतः हाताखालच्या माणसांशी तुम्ही
कसे वागता, यावरून
तुम्ही कसे आहात
याचाही अदमास येत असतो.
एखाद्या भेटीतही माणसाच्या मनात
स्वतःचं स्थान निर्माण करण्याची
हातोटी प्रत्येकालाच साधते, असं नाही.
पण मोहन गोरे
याही गुणाला अपवाद
नाहीत. आपले सहाध्यायी
किंवा सहकारी असोत,
एखादा कामगार असो,
की ग्राहक म्हणून
सामोर्या आलेल्या कंपनीचा सर्वेसर्वा
असा मालक असो,
यातल्या प्रत्येकाशीच गोरे उत्तम
संबंध राखून आहेत.
यातले अनेकजण नंतर
त्यांचे स्नेही बनले, ते
गोरे यांच्या स्वभावामुळेच.
अशा या कर्तबगार,
जगन्मित्र असामीची ही आनंदयात्रा
सार्या जगभरात यशाचे ठसे
उमटवत निरंतर सुरू
आहे. हे पुस्तक
अनेक अंगानी प्रेरित
करते. व्यक्ती म्हणून
जगावे कसे, व्यावसायिक
म्हणून वागावे कसे, हे
दाखवते. इतकंच नाही, तर
कोणतंही पाठबळ नसेल तरीही
जिद्द, कष्ट आणि
आशावाद यांच्या जोरावर स्वतःच्या
आयुष्याचे शिल्प खरोखरीच घडवता
येतं, हे दाखवून
देते.







0 comments:
Post a Comment